Skip to content
Home » ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम आहे ती सोडून निघून जाईल असं का वाटतं ?

ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम आहे ती सोडून निघून जाईल असं का वाटतं ?

ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम आहे ती सोडून निघून जाईल असं का वाटतं ?


डॉ. रोहिणी कोरके


आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडतोच कारण प्रेम ही मानवी मनाची सहजभावना आहे. ते काही कोणी ठरवून करत नाही. ते होऊन जाते. फक्त तरुणवयात गफलत इतकीच होते की प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजत नाही. बऱ्याच वेळा तरुण तरुणी आकर्षणालाच प्रेम समजण्याची गल्लत करतात त्यामुळे सुरुवातीला अतिशय बहरदार असलेले प्रेम हळूहळू कमी होत जाते आणि त्याचे रूपांतर Breakup मध्ये होते. दोन आकंठ प्रेमात बुडालेले जीव वेगळे होतात. ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम केलेले असते.

कधी काळी ज्या व्यक्तीच्या विरहाची कल्पनासुद्धा केलेली नसते ती व्यक्ती आपल्यापासून दुरावते. असे का होते ? की आपल्याच मनात सतत भिती असते की आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाईल?

तर याचे उत्तर असे की ज्या व्यक्तीवर आपण निखळ प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला सोडून जाण्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे आपला त्या व्यक्तीबद्दलच Possessiveness. आपण त्या व्यक्तीला इतके गृहीत धरायला सुरु करतो की तो आपल्या पॅटर्नपेक्षा थोडा जरी वेगळा वागू लागला की आपल्याला insecurity ची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते.

आणि हे फक्त नवरा-बायको प्रियकर-प्रेयसी यांच्या बाबतीतच घडते असे नाही इतर कोणत्याही नातेसंबंधातही असे घडू शकते. उदा. आई आणि मुलगा हे अगदी घट्ट नाते असते परंतु मुलाचे लग्न झाले की आईचे मन थोडे insecure होते. तिचं मन तिला सांगायला लागतं आता आपला मुलगा आपल्यापासून दुरावला जाईल. आता तो आपल्याला पूर्वीसारखा विचारेल की नाही? तो आपल्याला सोडून तर जाणार नाही ना?
खरंतर इथे मुलगा पूर्वी आईशी

पूर्वीप्रमाणेच वागत असतो. आईवर तितकेच प्रेम करत असतो. पण त्याच्याही आयुष्यात एक नवीन व्यक्ती आलेली असते. त्यामुळे
आईला दिला जाणारा वेळ थोडा कमी होतो. प्रत्येक गोष्ट जी आईला विचारायचा त्यातल्या काही गोष्टी आता बायकोला विचारल्या जातात. याचा अर्थ त्याचे प्रेम, काळजी कमी होते असा मुळीच नाही. पण काही आयांच्या हे लक्षात नाही. आणि आपोआपच त्याचा रोष सुनेवर जातो आणि त्याचं पर्यावसान मुलगा आणि सून दोघेही दुरावण्यात होते.

अजून एका छोट्याशा गोष्टीवरून आपण ही गोष्ट समजून घेऊया.एका कॉलेजमधील दोन जोडपी,एक नेहा आणि नकुल तर दुसरे जोडपे कविता आणि कल्पेश.नेहाच्या घरी खूप strict वातावरण होते त्यामुळे तिला या प्रेमाच्या भानगडीत पडायचं नव्हतं पण प्रेम हे नकळत होऊन गेलं. नकुल पण समजदार होता.तिने आधीच त्याला clear केलं होतं की ती त्याच्याशी लग्न नाही करू शकणार.

पण तोही नकळत तिच्यात गुंतला होता.पण त्यांचं प्रेम निखळ होतं.त्यात वासनेचा लवलेशही नव्हता.कुठेही दिखावा नव्हता.त्यामुळे त्यांनी कधीच एकमेकांवर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही.या अगदी उलट परिस्थिती कविता आणि कल्पेशची. कविताचं पहिलं break up झालेलं त्यामुळे तिला कोणाचा तरी आधार हवा होता.कल्पेशच्या आयुष्यात अजून कोणीही मुलगी नव्हती.तर कविता त्याच्याशी बोलू लागली तर तो एकदम हुरळून गेला.आकर्षण तर होतंच.

मग थोडे दिवस सगळं छान चाललं.कॉलेजमध्ये ही कुठेही दोघे एकत्रच दिसायचे.मग कविताही depression मधून थोडी बाहेर आली.शारीरिक आकर्षण ही कमी झालं. मग सुरू झाली भांडणं,प्रत्येक गोष्टीत कटकटी त्याचं रूपांतर एकमेकांना टाळण्यात आणि नंतर break up मध्ये.कविताने तर तिची गरज भागवली पण कलपेशला तिची सवय झाली होती.तो खूप खचून गेला.

यात त्याची चूक काय झाली तर त्याने प्रेम आणि आकर्षण यामधे गल्लत केली. आकर्षण म्हणजेच प्रेम असं त्याला वाटलं.तर नेहा अन् नकुल यांच्यात असं कधीच झालं नाही.पुढील आयुष्यात दोघेही एकमेकांपासून दूर झाले तरी त्यांचे मैत्रीचे नाते कायम टिकून राहिले.

या दोन उदाहरणांवरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ‘प्रेमयोग’ हा जगातील सर्वश्रेष्ठ योग श्रीकृष्णाने सांगितला आहे. गोकुळातील राधिकेला गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्ण कधीही भेटला नाही.

पण त्यांचे प्रेम कमी झाले का? उलट त्याची पत्नी नसूनही आजही श्रीकृष्णासोबत तिचेच नाव अधिक जोडले जाते. याचा अर्थ श्रीकृष्णाला त्यांच्या रुक्मिणी, सत्यभामा इ. पत्नी प्रिय नव्हत्या असा नाही. आयुष्याच्या ज्या ज्या टप्प्यावर ज्या ज्या व्यक्ती त्याला भेटल्या त्यांच्यावर त्याने निखळ, निरपेक्ष प्रेम केले म्हणूनच त्याच्या सहवासात आलेल्या व्यक्तींना तो सोडून जाण्याची भिती कधीच वाटली नाही, जरी तो शरीराने त्यांच्यासोबत नसला तरीही!

म्हणूनच एखादया व्यक्तीवर निखळ,निरपेक्ष प्रेम करा आणि सोडून दया.ती व्यक्ती सतत आपल्यासोबत राहीलच,आपल्या मनाप्रमाणे वागेलच अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या मनातील त्या व्यक्तींची, त्या क्षणांची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही हे नक्की!



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!